गुरुवार, २६ मे, २०११

माणूसपण

बरंच झाल मी कधी
व्यासांना भेटले नाही...
शेक्सपीयर, शेले, किट्स.,
यांनाही नाही...

शेक्सपीयरला आनंदी
पाहवलं नसतं...
हसून त्याने केलेलं
प्रियाआरधन मनाला
काही भावलं नसतं...
त्याने आनंदी राहवंच कसं ?
गणित कधीच जमलं नसतं
बरं झालं...

कालिदासाला नाही भेटले
नशिबच...
नाहीतर ऋतुसंहार प्रमाणे
त्याच्या आयुष्यातले बदलते
ऋतु मला पेलले नसते...
मेघदूतातल्या एका वेड्या
मेघाने असेच कोसळणे.,
आत खोलवर सलले असते
बरं झालं...

कुसुमाग्रजांच्या कवितेलाच
मी माझी सखी मानलं...
त्यांच्या ताठ कण्याला
मनात का होइना
सरळ नी ताठच ठेवलं...
सरळ कण्याला टक्क्याटोणप्यात वाकलेलं
मानवलं नसतं...
वेडात दौडलेल्या त्यांच्या
सात वेडयांचं वेडेपण
आयुष्यात शहाणं झालेलं
पाहवलं नसतं...
बरं झालं...

भटांची गझल
खोलवर रुजली, फुलली,
आणि मनापासुन तीने
साथ ही दिधली...
पण कदाचीत, "आयुष्य" फुलवत नेण्यार्‍या
या गझलेला, आयुष्य "ढकलत" जगताना
पाहवलं नसतं...
रोजच्या फुलत्या वसंतात
शिशिराचं येणं साहवलं नसतं
बर झालं त्यांनाही नाही भेटले...


आकाशीचा चंद्रमा
पृथ्वीवरुनच पहावा...
जवळ गेले कि त्यातले
खड्डे प्रकर्षाने दिसतात...
शीतल चंद्रावर काळे दाग
खुप खुप खुपतात...
नक्षत्रांना आकाशीच्या
आकाशयात्रीच राहू द्यावं...
काटेकोर काटेरी माणुसपण
त्यांना अस्पर्श रहावं...

अनुजा (स्वप्नजा)

संस्कार :2

पायच काय मनही ठेचाकाळंलय रक्ताळंलय ...
"अनामिक" पणे तुझ्या स्वप्नाचा विचार करता करता
स्वतःला कधी या मतलबी जगात विकल नाहीरे कळल .......

आज हॉटेल च्या पायर्या चढले ते डील पक्क करायचाच म्हणून
नोक केल आणि समोर तु ..
काय काय आतिषबाजी झाली मनात रंगांची स्वप्नाची ...
सगळ्या सगळ्या ची...
पण हे सगळ तु मिठीत घेइपर्यन्तच ..
नंतर वास्तवच जहरी भान आलं ...
आतिषबाजी नंतरच्या राखेसारख .....

नकार दिला आणी पुन्हा एकदा ...
अक्षरशः आत्महत्या केली मी....

आधी क्षणा क्षणा ला मारताना नरक भोगताना
डोळ्या समोर तु होतास
पण आता तेही समाधान संपलाय ....

त्या "अनामिकाचा" शोध थांबव आता
कारण त्याच विहित आणि अधिलिखित कार्य
तुज्या मिठीत आल्याआल्या संपलय .....

आता मस्त कॉकटेल जमलय
संध्याकाळ हळूहळू रात्रीत वीर्घलातेय
आणि वर पाऊसही रिमझिंमतोय
हातात rum आणि मनात तुझी आठवण
आता मस्त कॉकटेल जमलाय ......

तसं लिहून ठेवलाच आहे पण...
चितेला अग्नी तूच द्यायला हवायेस ....
कोणत्या नात्याने? खरच रे...
तुझी न होता दारोदार भटकलिये
देहाची लक्तरे घेऊन ....
पण त्या अनामिकाची परत फेड म्हणून तरी ....
अग्नी दे....

आता मस्त कॉकटेल होणारेय
माझ्या वेदनेच आणि मृत्यूच
शेवटच आणि सगळ्यातून सोडवणार ......

तुझ्या हातून एकतरी संस्कार या देहावर घडू दे .....
उद्या तूच अग्नी दे .............

अनुजा (स्वप्नजा)

संस्कार:1

आता मस्त कॉकटेल जमलय
संध्याकाळ हळूहळू रात्रीत विर्घलातीये
आणि वर पाऊसही रिमझिंमतोय
हातात rum आणि मनात तुझी आठवण
आता मस्त कॉकटेल जमलय ......

सोडून गेलास तेव्हा अशीच
संध्याकाळे सारखी विरघळून विरघळून
गेले होते ...
वाटले होते संपल आता आणि फक्त आता आठवणीचा पाऊस....
कोसळला खरा तो पण कशी कोण जाणे...
जगले मी हट्टाने ....

आणि आज अचानक समोर आलास ...
घट्ट अंधाराचा पडदा सारून
लखलखित प्रकाशासारखा ...
बघितलसपुन्हा पहिल्यासारख ..
एका नजरेत पिऊन टाकणार ...
मनात प्रचंड काहूर माजल खर
पण ...पण .. त्याआधीच पकडलास हात
आणि...
विचारलास त्याच आर्ततेने ..
डोळ्यात थेट डोळे घालून
शब्द थेट मनात उतरवून....
होणारेस ना माझी? फक्त माझी?
मी बोललेच नाही तेव्हासाराखीच ......
आणि घनगर्द मेघ प्राजक्ताला बिलगावा
तसं घट्ट मिठीत मिटून घेतलास
इतक्या दिवसांनी.....
इतक्या दिवसांनी जिवंत आहे असं उगाच भास झाला....

चिंब सडा प्राजक्ताचा बरसला खरा ....
म्हणालास ये आता फक्त तुझी कमी आहे
सगळ मिळवलाय मी फक्त पायी तुझ्या
टाकण्याची देर आहे ....
मी हसले तुला आवडते तशीच ..

तु गेला होतास ते कर्तुत्व फुलवायला ....
आणि सहज "विसरून जा" सांगून कट्यार चालवल्यावर ...
आता पुन्हा ये म्हणतोयेस ..
परतण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्यावर ...

काय रे म्हणालास कुणा अनामिकाने केली
होती पैशाची सोय...
किती भरभरून बोलत होतास त्याच्याबद्दल ...
पण विचारलास? कसे ग दिवस काढलेत माझ्या विना? ....
एका अवाक्षर...?

एका दोरीच्या दोन टोकांना
आपण दोघे बांधलो होतो...
जीतका वर तु जात होतास
तितकीच मी घसरत होते..........
आता तर नजर उचलून
तुझ्याकडे बघानाही शक्य नाहीये ...
आणि तु परतलायेस अश्या वळणावर.....

पण ... लगेच सावरलाय मी स्वतःला ...
आणि तत्क्षणी नकार दिलाय तुला....
तुझ्या फुटलेल्या स्वप्नांच्या
काचेवरून चालत जाऊन लिफ्ट चा
दरवाजा गाठला.........


क्रमशः 

चांदणकोर


नजर तुझी मधाची कट्यार 
स्पर्श तुझा चांदण अलवार 
श्वास तुझा अग्नी उबदार 
ओठ तुझे नशेचे कोठार


अशी चाले नयनाची जादुगरी 
हळूच तु मला बाहूत बद्ध करी 
श्वास विसावतो तुझा हळूच गाली 
ओठ उठवती मग लाख चंद्र भाळी 



मिठीत तुझ्या हरवते भान 
जवळ घेता उठे कल्लोळाचे रान
ओठ घेशी ओठी जणू अमृतपान
स्पर्श स्पर्श होतो तुझा रेशीम खाण



गात्रतुनी फुले मालकंस ओला 
श्वासातुने खुले वासंतिक झुला 
नाजूक नखाचा अंगावरी फुलोरा 
कधी नाजूक तर कधी होतो विखारा



पहाट दवात घेशी तु कवेत 
काटा सुखद बोचे तनामनात 
मिटून जाते मी आवेगी मिठीत 
नाहते मग मधुर चुंबन धारेत 



असे हे मिलन सुखद मधुर 
सोडताना मिठी दाटे हुरहूर 
पुन्हा घेशी ओढून जाताच मी दूर
विसावते पुन्हा कुशीत चांदणकोर 



अनुजा (स्वप्नजा)

सोमवार, ९ मे, २०११

सावित्रीच्या लेकी :-स्त्रीवाद नाही साम्यवाद



"आज पासून संध्याकाळच्या पोळ्या तु कर " आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या करण ही फार मोठी बाब नव्हतीच  मुळी ... पण ज्या कारणासाठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत...  कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नव्हती  तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस अस लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु ईथे कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुलाला किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलल असल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी ही मुलगीच असते ...आता म्हणाल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणण एवढ्च आहे की ज्या तडजोडी मुलीला कराव्याच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधी नवत स्वयंपाक करनार्या मुलांचं जे कौतुक होत आजहि ..तसच आमच्या नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्षा  नाहीये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???
स्त्री पुरुष  स्पर्धक नाहीत पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सांगितलेला  विचार अमलात कधी  येणार?

दे मंत्र पुन्हा जो दिला समर्थे तुझला


  रायगडावर जाण्याचा योग नुकताच आला पहिल्यांदा तीन तास वाट आणि नुसतेच सह्याद्रीचे सुळके पाहण्यात वेळ गेला पण नंतर अक्षराशः सार्थक झाल्यासारख वाटल. आधी पुणेकर असल्याने साहजिकच सिंहगड हाच जीव कि प्राण होता त्याची भव्यता खूप!!! पण आता हा किल्ला पहिला  आणि राजधानीचा खरा अर्थ कळला. तो इतका भव्य दरवाजा कि तो पाहताच आतल्या वैभवाची साक्ष पटावी. तसं पाहिलं तर मला विशेष अप्रूप नव्हत  वाटायचं कि त्यात काय! महाराजांबद्दल खूप अभिमान होताच पण तरीही पाऊल तसं मागेच होत. वाटायचं कि जणू ते दिवस पुन्हा तर येणार नाहीत कशाला त्यात गुंता? पण  रायगड पहिला आणि खरोखर पुन्हा इतिहासाच्या प्रेमात पडावसं वाटल मनापासून! तिथल्या मातीतून हर हर महादेव ची गाज आजही येते असा भास खरोखर होत होता. पवलागाणीक वाटायचं इथे शिवरायांचा स्पर्श झाला असेल इथे ते बसले असतील इथून कितीतरी मोहिमा पार पडल्या असतील सगळ कस अगदी भाराल्यासारख  झालेलं!
     तिथली बाजारपेठ पाहून तर तुळशी बाग डोळ्यासमोर तरळली, तो भव्य नगारखान  जिथून विजयाच्या शेकडो नौबती झडल्या असतील आणि तो राजप्रसाद जिथे महाराज सिहासनावर बसाले असतील ….. आणखी काय काय वाटत होत,  मनाशी विचार केला आपण एवढे emotional कधी झालो बर? मग कळल वातावरणाचा परिणाम होतोच कितीही अलिप्त राहायचं ठरवलं तरी एक झुळूक अशी येते कि तिच्या सुगंधाने आपल मन आपल्याला त्यात गुंतायला भाग पाडतं वाहवत नेत स्वतःसोबत आणि मी अशीच त्या शिवशाहीत अक्षराशः न्हाहून गेले. मग एक नवीन खेळ सुरु झाला प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती तो प्रसंग खरा घडतोय असा वाटू लागल आपण त्यातला एक अव्यक्त भाग आहोत हि जाणीव होऊ लागली. मन अभिमान, आनंद अश्या संमिश्र भावनांनी भरून आलं. कवी भूषण  आपल काव्य गाताहेत असं वाटू लागल.
      समाधीस्थळ आलं  आणि महाराज गेल्यावर जो कल्लोळ त्या लोकांच्या मनात  उठला असेल ती भावना मानत खोलवर दाटून  आली आणि लगेच वर्तमानात माझी पावलं आपोआप आली प्रकर्षाने वाटल पुन्हा तेच घडायला हव आहे का? परत सावरकरांनी म्हणल्या प्रमाणे ” दे मंत्र पुन्हा जो दिला समर्थे तुजला” असा घडायला हवय मंत्रमुग्ध  व्हायची वेळ आली आहे……फक्त मराठीपणाचे पोवाडे गावून काय होणारेय?  एवढी मोठी  राजधानी बांधणारा हिरोजी इंदुलकर आज आहे? जो इनाम मागतो तर काय एक क्षुल्लक शिलालेख ज्या वरूनही त्याची निष्ठाच ओसंडून वाहते ” सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ” ! आज सगळीकडे मंत्रीपदसाठी सख्यांचा जीव घेणारेच सपडतात.. महाराज त्यांच्या कार्याने आपल्यासाठी वाट आखून गेलेयेत पण त्यावर साध चालण्याच धैर्य किती जणात आहे? फुगत चाललेले पगार आणि परदेशवार्या यातून मध्यम वर्गाला वेळ नाही, मोठ्यांची दुखणीही मोठी आणि गरिबांना रोजच्या संघर्षातून वेळ आहे? आपल्या महाराष्ट्राला वाली आहे? आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने आपण खरोखर पोरके झालो आहोत? मागची अभिमानाची जाणीव कापरा सारखी उडून गेली, कसला अभिमान? माझ्या इतक्या २२ -२३  वर्षाच्या आयुष्यात मी काय केलं अस लोकविलक्षण? का मला त्यांच्या गड कोटांचा अभिमान वाटावा? माझ त्यात काय योगदान आहे?  मला फक्त जॉब्स अकॅडमिक इतक्यापुरातच रक्तच पाणी केलेलं आठवतं आता माझी खरच लायकी नाहीये त्यांच्या वैभवावर अभिमान धरण्याची……… मला अतिशय  एकट आणि अगतिक वाटू लागल तिथली चिमुटभर माती कपाळाला लावली आणि अस्ताला जाणार्या सूर्य सकट मी हि खूप एकाकी होऊन आणि असंख्य प्रश्न घेवून परतीच्या वाटेला  लागले.

रविवार, ८ मे, २०११

कविता किती अल्लड

कविता किती अल्लड होती वयासारखी !
घरासमोरच्या पिंपळपानातून सळसळत जायची,
एखाद्या दप्तरातून कधी हळूच डोकवायची,
चिमण्यांच्या चिवचीवाटात स्वप्नांचं घरट भारून टाकायची,
आणि जेव्हा ती घरी यायची,


हळूच माझ्या मनातून पेनात उतरून
वदवून घ्यायची काही हवं हळवं माझ्या कडून...
झर झर उतरून जायची, अलगद चाललेल्या पालखीसारखी...
कविता किती अल्लड होती वयासारखी !
आता काळाचा हात फिरलाय सगळ्यावर !
कोवळं अस्तर गळून गेलंय...
सुरुकुत्यांचं मळभ चेहऱ्यावर.., मनावर..!
छोट्या पायवाटेतून मोठेमोठे रस्ते.,
छोटे आनंद पायाखाली घेऊन
भले थोरले बाजारही सजले...

जसं निरागसतेत आणि माझ्यात अंतर पडत गेलं
तशी कविता ही रुसली...
तिच्या माझ्यातही नातं
लांब लांब होत होत
विरत गेलं...
सगळंच भरकटलं या दरम्यान !
शांततेला भगदाड पाडत बॉम्ब फुटत गेले.,
आईच्या कुशीची उब असूनही
लहानगे कोमेजले.,
कवितेच्या जागी रोज एक नवी घोषणा जन्म घेतेय.,
सृजनाच्या पोटी रोज एक नवी जात हुंकारतेय...

तुकड्यात वाटल्या गेल्या मनागत
कविताही भिरभिरतेय वार्‍यावर,
एका देशातून दुसरी कडे,
एका शहरातून दुसर्‍याकडे !
पण कधी कधी येते ती आडोश्याला माझ्या.
पण कोर्‍या आणि कोडग्या झालेल्या मनावर
तिचे थकले भागले हात आता उमटवत नाहीत अक्षर.

हिरमसून ती मग जाते दूर दूर
एका फुटपाथ वर संपलेल्या स्वप्नडोळ्यात,
आणि हलकेच त्या रखरख पापणीवर
गोठून जाते पहाटदवासारखी...
कविता किती अल्लड होती वया सारखी !


मूळ कविता- नज़्म बहोत आसान थी पहले
मूळ कवी- निदा फ़ाज़ली
स्वैर भावानुवाद- अनुजा


मूळ रचना :-

नज्म बहुत आसान थी पहले
घर के आगे
पीपल की शाखों से उछल के
आते-जाते बच्चों के बस्तों से निकल के
रंग बरंगी चिडयों के चेहकार में ढल के
नज्म मेरे घर जब आती थी
मेरे कलम से जल्दी-जल्दी खुद को पूरा लिख जाती थी,

अब सब मंजर बदल चुके हैं
छोटे-छोटे चौराहों से चौडे रस्ते निकल चुके हैं
बडे-बडे बाजार पुराने गली मुहल्ले निगल चुके हैं

नज्म से मुझ तक अब मीलों लंबी दूरी है
इन मीलों लंबी दूरी में कहीं अचानक बम फटते हैं
कोख में माओं के सोते बच्चे डरते हैं
मजहब और सियासत मिलकर नये-नये नारे रटते हैं

बहुत से शहरों-बहुत से मुल्कों से अब होकर
नज्म मेरे घर जब आती है.
इतनी ज्यादा थक जाती है
मेरी लिखने की टेबिल पर खाली कागज को खाली ही छोड के
रुख्सत हो जाती है और किसी फुटपाथ पे जाकर
शहर के सब से बूढे शहरी की पलकों पर
आँसू बन कर
सो जाती है।

..निदा फ़ाजली

शनिवार, ७ मे, २०११

मी झालेच नाही

मी अशी गझल जी मतल्यातच अडकून पडली
काफिये रदीफ दूर मूळ मात्रांतच होती चुकली

मी धृपद नव्हते कडाडणारे नव्हते ठुमरी वेडी
मी लकेर कोवळी नवथर होते हुकली मुकली

मी नव्हते मुरली किंवा राधा श्रीरंग ल्यायलेली
मी मीरा होते आभासात तयाच्या वेडी जी झाली

मी रडले तेव्हा आकाशी या घन कळवळले नाही
पण भल्या पहाटे प्राजक्तावर दवनक्षी होती सजली

मी झालेच नाही तुझी कविता लयीत फुलती खुलती
मी निम्मीशिम्मी अशी निर्मिती मनात राहून गेली

अनुजा

अनौरस

आसुसुन तीने बाळाला हातात घेतले
आणि गुंतत गेली ती त्या बाळवासात
तो कोवळा नाजुक नवथर वास ती
साठवत रहिली श्वासात पान्ह्यात काळजात

सगळ संपल असली तरी आईपण
अजुन एवढ ताज कस? तीला नेहमी वाटे
सृजनाचा तो सोहळा पहाताना नेहमीच
वेदना आणी सुखही तिच्याही गात्रातुन दाटॆ

फ़ुलांचा भार पेलण्याची ताकद असुनही
काही वेलींना पानांची वेदना जपावी लागते
मुळच काय आधाराचे वृक्ष ही उन्मळून पडले
तरी वांझपणाचीही धुरा सांभाळायची असते

सहज मन दुसरी कडे जाव म्हणून
खिडकी बाहेर जाते तीचि नजर
चिंध्यात गुंडाळलेल अस्ताव्यस्त
नजरेला पडत एक देहाच लक्तर

हो ती तीच वेडी असते नेहमी
घरसमोरच्या रस्त्यावर हिंडणारी
डोळ्यात आख्ख शुन्य होत तिच्या
पन लक्तरातून होती न लपणारी उभारी

आज नेहमीच्या हालचालीत त्या वेडिच्या
एक अस्वस्थ जडपणा भरुन राहिला होता
खिडकी जरी आड असली दोघींच्या तरी
तीला तो क्षणाक्षणाला जाणवत होता

न राहवून ती उतरलीच झपाझप जीने
वेडी डोळ्यात शुन्य घेवुन निर्मळ हसुन गेली
आणि तीच्या वाढलेल्या पोटाकडे बघुन
हसता हसता हीची पावल थिजुन गेली

अनुजा(स्वप्नजा)

एकटीच

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी
तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी

का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले
वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले
ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे
तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे
अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी
वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी
का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु
भंगल्या तनुतही का छेडीले गांधार तु
स्वप्नंभंगातूनही माझ्या अजून हिंडोल हुंकारी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

मृत्युच्या नेक खांद्यावरी फुलणार आता बागेसरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी





अनुजा(स्वप्नजा)

शुक्रवार, ६ मे, २०११

जीवनानंद मानला

आनंदाचा अर्थ माझा नेहमीच गहिरा राहिला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

मी गाळले अश्रू दुख्खावेगाने जरी किती
अश्रू संगेच माझ्या प्राजक्ता हा बहरला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला


श्वासच झाला शत्रू इथे अन सुटला किनारा जरी
पण अश्रू माझे पिउनी सागरा खारा जाहला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

तरारून पाणी आले काटा बोचता जीवघेणा
त्याच वेळी फुलाने सुगंधाने मुग्ध नाहावले मला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

मृत्यू झाला आज माझा जिवाभावाचा सखा
परी माझा मृत्यूही मेघांनी केला साजरा
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

झाले मी राख राख अस्तित्वही संपले जणू
पण दारातल्या जाईतुनी श्वास माझा हुंकारला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

वाटेवरी जीवनाच्या दुख्खाच आसुसून भेटले मला
मी ही मग त्यालाच माझा जीवनानंद मानला


अनुजा(स्वप्नजा)

गुरुवार, ५ मे, २०११

चल आता मोडू चौकट

  मी नेहमीच अशी होते 
आणि तु नेहमीच तसा
माझ्या कवेत आभाळ सार
तुझा नकाराचा वसा

उल्का कोसळून व्हावी राख
समुद्राची किनार्यावर फुटावी लाट
झोकून द्याव मिठीत तुझ्या
होऊन पिसाट झंजावात

समिधे सारख जळून जाव
आगीत प्रेमाच्या झोकून द्याव
विझून गेली आग तरी
निखार्या सम धगधगाव

तुज्या कडे मी कधी मागितलं?
चांदण्यांनी भरलेलं आभाळ?
वसंतही फुलता नको होता
नको होता पाऊसकाळ

हव होत वेडेपण जलधारेसारख
उंचावरून कोसळणार
असंख्य अडथळे येऊनही
अखंडपणे वाहणार

मी अजूनही तशीच आहे
बेभान तुझ्याच साठी
तु बदललास पुरता
बदलूनही घेतलीस नाती

आता पुन्हा येतेय मी
जुनच वादळ नव्याने घेऊन
मुठीत माझ्या जुनीच स्वप्ने
आक्रोशात आजही आक्रंदून

आता तरी एकवार
घट्ट कर तुझी मिठी
जखम पुन्हा उघडी झाली
वाहून गेली माती

चल आता मोडू चौकट
लांदून जाऊ क्षितीज रेघ
बरसुया केवळ आपल्याच साठी
होईन वेडा सावळ मेघ ....


अनुजा (स्वप्नजा)


कृष्णपीस