गुरुवार, २६ मे, २०११

माणूसपण

बरंच झाल मी कधी
व्यासांना भेटले नाही...
शेक्सपीयर, शेले, किट्स.,
यांनाही नाही...

शेक्सपीयरला आनंदी
पाहवलं नसतं...
हसून त्याने केलेलं
प्रियाआरधन मनाला
काही भावलं नसतं...
त्याने आनंदी राहवंच कसं ?
गणित कधीच जमलं नसतं
बरं झालं...

कालिदासाला नाही भेटले
नशिबच...
नाहीतर ऋतुसंहार प्रमाणे
त्याच्या आयुष्यातले बदलते
ऋतु मला पेलले नसते...
मेघदूतातल्या एका वेड्या
मेघाने असेच कोसळणे.,
आत खोलवर सलले असते
बरं झालं...

कुसुमाग्रजांच्या कवितेलाच
मी माझी सखी मानलं...
त्यांच्या ताठ कण्याला
मनात का होइना
सरळ नी ताठच ठेवलं...
सरळ कण्याला टक्क्याटोणप्यात वाकलेलं
मानवलं नसतं...
वेडात दौडलेल्या त्यांच्या
सात वेडयांचं वेडेपण
आयुष्यात शहाणं झालेलं
पाहवलं नसतं...
बरं झालं...

भटांची गझल
खोलवर रुजली, फुलली,
आणि मनापासुन तीने
साथ ही दिधली...
पण कदाचीत, "आयुष्य" फुलवत नेण्यार्‍या
या गझलेला, आयुष्य "ढकलत" जगताना
पाहवलं नसतं...
रोजच्या फुलत्या वसंतात
शिशिराचं येणं साहवलं नसतं
बर झालं त्यांनाही नाही भेटले...


आकाशीचा चंद्रमा
पृथ्वीवरुनच पहावा...
जवळ गेले कि त्यातले
खड्डे प्रकर्षाने दिसतात...
शीतल चंद्रावर काळे दाग
खुप खुप खुपतात...
नक्षत्रांना आकाशीच्या
आकाशयात्रीच राहू द्यावं...
काटेकोर काटेरी माणुसपण
त्यांना अस्पर्श रहावं...

अनुजा (स्वप्नजा)

२ टिप्पण्या: